Shri Tuljabhavani Temple Trusts,
Shri Tuljabhavani Sainiki Sec. & Higher Sec. School,Tuljapur
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर

दिवस ! 7 नोव्हेंबर
——————————-
मित्रांनो आजचा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी दिवस होय! 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस! महान शिल्पकार – विद्यार्थी दिवस!! मित्रांनो आज सात नोव्हेंबर शिक्षणाचे शिल्पकार, शिक्षण सम्राट, शिक्षण तज्ञ, शिक्षण तत्त्ववेत्ते, शिक्षणनाचे प्रणेते, शिक्षणाचे क्रांतिकारक, अनाथांचे नाथ, दीन दुबळ्यांचे कैवारी, भारताचे संविधान कर्ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम शाळा प्रवेश!! म्हणजेच विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. आज विद्यार्थी दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तसेच शुभ दीपावली दीपावलीच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! शिक्षण हे विकासाचे, प्रगतीचे साधन म्हणून शिक्षणाला महत्त्व देणारे, शिक्षण व पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे, पुस्तक म्हणजे जीव की प्राण असणारे, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन म्हणजे 7 नोव्हेंबर. हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.

 महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2017 पासून पूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. ७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रताप सिंग हायस्कूल सातारा येथे प्रथम शाळा प्रवेश झाला. आणि तोच विद्यार्थी दिवस म्हणून पुढे आला. एक विद्यार्थी बनून जीवनभर शिक्षण क्षेत्रात प्रवास केला. जगाला धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता समानता ही मूल्ये शिकविली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. शिक्षणावर व पुस्तकावर खूप प्रेम केले. अत्यंत गरिबी हालाखीची परिस्थिती. सामाजिक ढवळाढवळीचे दिवस, अशा या संघर्षातून शिक्षण हा केंद्रबिंदू मानून, शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही असे जाणून त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रथम शाळेत घातले व हळूहळू शाळेचे गोडी निर्माण झाली. वाचनाचे वेड लागले, वाचनाने खरा माणूस घडतो ही शिकवण त्यांच्या अंगी बानलि व वाचनातूनच ते स्वतः घडले. महान चरित्रांचा अभ्यास केला महान व्यक्तीच्या कार्याचा अभ्यास केला जगातील विद्वान लोकांचे चरित्र वाचले त्यांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष वाचला. समाजाला घडवले व देशाला घडवण्याचे मूल्यवान कार्य केले म्हणून आजचा हा दिवस अत्यंत प्रेरणादायी, शिक्षण प्रेमींसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोलाचा ठरेल. त्या काळात त्यांनी घेतलेले शिक्षण हे आश्चर्यकारक मानावेच लागेल. 

आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या परिस्थितीला तोंड देत त्यांचा मुकाबला करत त्यांनी विजय प्राप्त केला व यशाचे शिखर गाठले.
त्यांचा धाडसीपणा, त्यांचे चातुर्य त्यांचे, ज्ञान कौशल्य व त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा या गुणामुळेच ते भारतरत्न ठरले!! हा आज आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची व संघर्षाला तोंड देण्याची कला व धाडस प्राप्त होते म्हणून आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा भविष्यातील देशाचा आधारस्तंभ आहे. आजचा विद्यार्थी उद्या देश घडविणारा आहे. आजचा विद्यार्थी उद्या देशाचे संरक्षण करणारा आहे. आजचा विद्यार्थी हा उद्या देशावर राज्य करणारा आहे. म्हणून तो प्रामाणिक, चरित्रवान कार्य कुशल, कर्तव्यदक्ष देश प्रेमी, समाज हिताचा विचार करणारा घडला पाहिजे, बनला पाहिजे. वाचाल तर वाचाल असेच म्हणावे लागेल. आजच्या मोबाईल व इंटरनेट युगात पुस्तकांना दुर्लक्षित केले जात आहे. परंतु पुस्तका एवढा चांगला मित्र, पुस्तका एवढा प्रामाणिकपणा, पुस्तकाएवढे खरे ज्ञान इतर कोठूनही मिळणार नाही! म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी मैत्री केली पाहिजे. विद्यालयीन व महाविद्यालयीन युवकांनी मोबाईलचे वेड कमी करून पुस्तकांचे वेड लागले पाहिजे. आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त या महामानवाला व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन!
——————————-——–

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा धाराशिव