मोबाईलचा अतिवापर म्हणजे—————————————
आरोग्यास अति घातक व्यसन!!
मोबाईलचा अतिवापर म्हणजे
—————————————
आरोग्यास अति घातक व्यसन!!
—————————————
देशाची प्रगती होणे व विकास होणे हे आपले सर्वांचे ध्येय असते. सर्वसामान्य नागरिकांना वाटते की, आपला देश सुधारला पाहिजे, सुसंस्कृत बनला पाहिजे, विविध क्षेत्रात देशाची प्रगती झाली पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती झाली पाहिजे. ही आपली देशाबद्दलची सर्वसाधारण प्रेमाची भावना असते. पण आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि मोबाईल जगासमोर आला, समाजासमोर आला. फक्त आलाच नाही तर कमीत कमी कालावधीत तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करू लागला. इतक्या जवळचा झाला की आज परम प्रिय मित्र बनला. जसं मित्रामध्येही काही दोष असतात तसेच या मोबाईल मध्ये काही दोष असतात, हे आपण विसरुनच गेलो आणि मग तो काही काळात आपला जिवलग मित्र बनला! प्रत्येक क्षेत्रात मोबाईलचा सर्रास वापर वेगाने सुरू झाला. अगदी क्षणार्धात कुठलीही जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आपल्याला मिळू लागली. शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कृषी, व्यापार, उद्योग, लघुउद्योग, शेती, नोकरी अशा अनेक क्षेत्रात मोबाईल ने आपली पकड बसवली आहे! भरपूर प्रगती झाली हे अगदी खरे असले तरी विद्यार्थी जीवनावर, नवयुवकावर त्याचा किती व कसा परिणाम होतो आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. मोबाईल काळाची गरज म्हणून वापरणे हे योग्य आहे, काळा बरोबर चालण्यासाठी वापरणे हे योग्य आहे, योग्य वेळी, कामाच्या वेळी वापरणे हे अगदी योग्य आहे, मनोरंजनासाठी थोडा वेळ वापर ठीक आहे. कामाच्या वेळी, संपर्क साधण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी याचा वापर जरूर केला पाहिजे पण मोबाईल व्यसन बनता कामा नये. व्यसन बनवू नये, व्यसन बनू देऊ नये! आजची तरुणाई धूम्रपान बिडी, सिगारेट, गांजा, दारू, नसिले पदार्थ, अशा व्यसनाबरोबरच मोबाईलचे व्यसनाधीन होत चाललेली दिसून येत आहे!! मोबाईल व्यसन बनता कामा नये त्याचे दुष्परिणाम आपल्याला, समाजाला, पर्यायाने देशाला भोगावे लागतील. आपणा सर्वांना भविष्यात अत्यंत घातक स्वरूपाचे दिसून येतील. दुष्परिणामामुळे नवीन पिढी, तरुणाई, विद्यार्थी विशेषतः कॉलेजमधील तरुणाई, मोबाईलच्या विळख्यात जाळ्यात अडकत चाललेली आहे! ज्याप्रमाणे एखादा मोठा हत्ती चालत चालत दलदलीच्या दिशेने जावा आणि जसजसे पुढे जाईल, तो जास्तीत जास्त दलदलीत फसून बसेल!! पुढेही जाता येणार नाही आणि मागेही सरकता येणार नाही. मग कल्पना करा कशी अवस्था असेल ती !! रात्र-रात्र मोबाईल बघण्यात जागून काढत असलेली ही मुले रात्रभर काय अभ्यास करीत असतील ? इंटरनेटवर काय बघत असतील? ते बघा! सर्वच विद्यार्थी असे असतात असे नाही. हुशार, होत करू, जिद्दी, व्यासंगी, अभ्यासू विद्यार्थी या मोबाईलचा चांगला उपयोग करून घेत आहेत. पण काहींना ते जमत नाही ते मोबाईलला व्यसन बनवत आहेत आणि हीच बाब आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे! कारण जास्तीत जास्त वेळ व सतत मोबाईल वापरामुळे प्रथमतः डोळ्यावर विपरीत परिणाम होतो. जे सुंदर डोळे देवाने आपल्याला सुंदर जग पाहण्यासाठी दिलेले आहेत त्यावर विपरीत परिणाम होतो! मेंदूवर घातक परिणाम होऊन विस्मरण होण्याची शक्यता असते! विचार करण्याची शक्ती कमी होऊ लागते आणि आपल्या मेंदूची कार्यक्षमता हळूहळू मंदावते! मोबाईल मुळे निद्रा नाश देखील होतो झोप मोड होऊन जागरण होते व त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे तयार होताना दिसतात. मोबाईल मधून निघणारे ब्लू लाईट इन्फो राइट रेस याचा डोळ्यावर फार मोठा परिणाम होतो. सततच्या फोन मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हृदयविकाराचा धोका देखील उद्भवतो!! डोळे लाल होतात, डोळे सुजतात, डोळ्यात पाणी येऊ लागते, अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. कोणतीही गोष्ट माणसाने अति करू नये. आती केल्यास त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगावच लागेल! कारण पेराल तेच उगवणार आहे. कुठलेही व्यसन हे घातकच असते. आपल्या शरीरावर विविध मार्गाने अटॅक करणारे. असते म्हणून व्यसनापासून सावधान असले पाहिजे जसे व्यसन असते तसेच वाईट संगतीचाही परिणाम असाच होतो. संगत ही चांगल्या लोकांची, चांगल्या विचारांची, प्रेरणादायी तसेच सकारात्मक विचारांची असली पाहिजे. ती केली पाहिजे, शोधली पाहिजे. वाईट संगती पासून दूर राहिले पाहिजे व आपले स्वतःचे वेगळे कर्तृत्व निर्माण केले पाहिजे. आपण चांगला रस्ता शोधत पुढे गेलो तर सगळे आपल्या मागून त्या रस्त्यावर येतील. प्रथमतः आपण स्वतः चालून रस्ता तयार केला पाहिजे. येणाऱ्या भविष्यकाळात मोबाईलचे दुष्परिणाम दिसून येतील म्हणून आजपासूनच छोट्या छोट्या मुलावर संस्कार करताना मोबाईलचे वेळापत्रक, मोबाईलचे नियम, त्याचबरोबर मोबाईलचेही काही संस्कार त्यांच्यावर घडवणे अत्यंत गरजेचे आहे. लहान लहान मुले, मुलि विविध गेम खेळण्यात मग्न असतात. त्यांना वेळ कसा गेला हेही कळत नाही. मोबाईल हे खेळणे, नव्हे खेळणी म्हणून नव्हे तर एक शैक्षणिक साधन म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. अभ्यासाविषयी प्रेम, काळजी, जिद्द, राहत नाही. आपण पाहतो आधुनिक काळात मुलांचे वाचन कमी झालेले आहे. वाचनाकडे प्रत्यक्षात दुर्लक्ष केले जाते. मोबाईल टीव्ही ही सगळी शैक्षणिक साधन आहेत. शिकवताना अध्यापन करताना वेळोवेळी गरज पडेल तिथे त्याचा वापर केला पाहिजे. ही सगळी आत्याधुनिक उपकरणे, यांत्रिक साधने ही शैक्षणिक साधने म्हणून उपयोग केला पाहिजे. लहान मुलांना वाचन संस्कृतीकडे वळवणे काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल असेच म्हणावे लागेल. प्रत्येक शाळेत ग्रंथालय असलेच पाहिजे. व त्या ग्रंथालयाचा सतत विद्यार्थ्यांना उपयोग झाला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाविषयी प्रेम वाढेल व अभ्यासाची गोडी लागेल. मोबाईल टीव्ही वेळोवेळी फक्त शैक्षणिक साधन म्हणून उपयोग केला पाहिजे.
देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद.
Panchal Sir Sainiki: मोबाईल पासून सावधान!
Address: Rajshree Shahu Nagar, Near Engineering College Campus, Tuljapur
Phone: 9422654655
E.mail Us at stbsvt@gmail.com.